Hero Image

महागाईचा चटका कोणाला?

-डॉ. अनिल पडोशीगेल्या अनेक दिवसांपासून देशातील वाढत्या महागाईसंबंधीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. ‘महागाईमुळे घराचे बजेट कोलमडले’, ‘सामान्य माणसाचे कंबरडे मोडले’ अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा अनेकवेळा येतात. या संदर्भामध्ये अन्नधान्यांच्या वाढत्या महागाईमुळे सरकार, रिझर्व्ह बँक आणि सर्वसाधारण जनता असे सर्वजण चिंताग्रस्त आहेत.
महागाई कमी झाली पाहिजे, यासंबंधी सर्वांचे एकमत आहे. अद्यापही महागाई पुरेशी आटोक्यात आलेली नाही, ही चिंताजनक बाब आहे. तथापि, वाढत्या महागाईचे विश्लेषण करून त्यावर उपाय सुचविणे हा या लेखाचा हेतू नाही; तर वाढत्या महागाईचा चटका कोणाला आणि कितपत बसत असेल याचा अभ्यास करणे, हा या लेखाचा मुख्य हेतू आहे. कारण वाढत्या महागाईचे चटके बसले की त्यामुळे असंतोष वाढतो. परंतु महागाई वाढूनसुद्धा जर इतर काही कारणांनी चटके बसले नाहीत तर असंतोष विशेष होत नाही. त्यामुळे बसत असलेल्या/नसलेल्या चटक्याचा अभ्यास करणे हेही महत्त्वाचे आहे.
असो.महागाई कशी मोजली जाते?आपल्या देशात महागाई मोजण्याचे साधन म्हणजे महागाईचा निर्देशांक होय. उदाहरणार्थ मार्च २०२३ ते मार्च २०२४ या काळात महागाई वाढली की कमी झाली हे बघावयाचे असल्यास सर्व वस्तूंची एकत्रित सरासरी किंमत २०२३ मार्चमध्ये १०० आहे असे मानले जाते. मार्च २०२४मध्ये त्याच वस्तूंची एकत्रित सरासरी किंमत जर १०८ असेल तर महागाई ८ टक्क्यांनी वाढली असे मानले जाते. सन २०२५मध्ये हीच किंमत जर ११० झाली तर महागाई ढोबळमानाने २ टक्के वाढली असे मानतात. (११० गुणिले १००/१०८ = १०१.८.
म्हणजे साधारण २ टक्के) म्हणजे महागाईचा वेग ८ टक्क्यांवरून २ टक्के इतका कमी झाला, असे होते. याप्रमाणे प्रत्येक वर्षीची महागाई मोजली जाते.ठोक आणि किरकोळ महागाईवस्तूंच्या ठोक किंमतीतील चढउतार मोजणाऱ्या निर्देशांकास ठोक निर्देशांक, तर किरकोळ किंमतीतील चढउतार मोजणाऱ्या निर्देशांकास किरकोळ निर्देशांक म्हटले जाते. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने किरकोळ निर्देशांक (म्हणजे किरकोळ महागाई) अधिक महत्त्वाची असते; कारण सामान्य माणसास आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी किरकोळ किंमत द्यावी लागते.
किरकोळ किंमत ठोक किंमतीपेक्षा जास्त असते. याचा बरा-वाईट परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर तात्काळ होत असतो. किरकोळ किंमती भडकल्या तर मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये असंतोष होऊ शकतो. यामुळे किरकोळ महागाई शक्यतोवर आटोक्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.अन्नधान्याची किरकोळ महागाईसर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अन्नधान्याची किरकोळ महागाई सर्वांत महत्त्वाची होय. भारतासारख्या देशामध्ये सामान्य व गरीब लोकांचा त्यांच्या प्राप्तीमधील फार मोठा खर्च अन्नधान्यावर केला जातो.
अन्नधान्ये जर महाग झाली तर गरीब जनतेचे आर्थिक जीवनमान तात्काळ खालावते. त्यामुळे अन्नधान्यांची महागाई कमी ठेवणे, हे प्रत्येक सरकारचे प्रथम कर्तव्य असते. वेळप्रसंगी इतर उपाय योजून सरकारने गोरगरिबांसाठी अन्नधान्ये स्वस्त ठेवणे आवश्यक असते. श्रीमंत देशामध्ये लोकांच्या प्राप्तीपैकी लहानसा भाग अन्नधान्यावर खर्च केला जातो. त्यामुळे अन्नधान्ये महाग झाली तरी श्रीमंत देशातील जनतेला आणि गरीब देशातील श्रीमंत लोकांना फारसा फरक पडत नाही, हे विसरू नये. यानंतर महागाईमुळे बसू शकणाऱ्या चटक्याचा अभ्यास करू...चटका बसणे म्हणजे काय?महागाई वाढली, सामान्य माणसाचे कठीण आहे, अशी सर्वजण तक्रार करीत असतात.
तथापि महागाई वाढल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेली किंवा हवी असलेली वस्तू विकत घेता येतच नाही, परवडत नसल्याने सोडून द्यावी लागते तेव्हा महागाईचा चटका बसला असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र हे सर्व तारतम्याने घ्यावे. कारण एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला सेलिब्रिटी घेतात तसला फ्लॅट परवडणार नाही. याला ‘चटका’ म्हणणे हास्यास्पद होईल. तेव्हा चटक्याचा विचार जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात करावा.चटका कमी/जास्त करणारे घटकमहागाई वाढली तर त्याचा परिणाम/चटका कमी/जास्त करणारे अनेक घटक आहेत.
सविस्तर पाहू. : १) महागाई वाढली तरी आपली प्राप्ती/क्रयशक्ती जर महागाईपेक्षा जास्त वाढत असेल तर चटका जाणवत नाही/ कमी जाणवतो. २) जीवनावश्यक वस्तू, सेवा इ. गोष्टी जर सरकारकडून किंवा कंपनीकडून विनामूल्य किंवा अगदी नाममात्र किंमतीमध्ये मिळत असतील तर चटका बसत नाही. उदा. निवासस्थान, नोकर-चाकर, वाहन, टेलिफोन, अनुदानित भोजन, उपाहारगृह इ. ३) ज्या वस्तूवर आपण एकूण खर्चापैकी फार थोडा भाग खर्च करतो त्याची भाववाढ झाली तरी चटका बसत नाही. उदाहरणार्थ सामान्य माणूस आणि सोन्याची किंमत! या सर्व घटकामध्ये दरमहाची होणारी प्राप्ती (वेतन, व्याज, फायदा इ.) हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
प्राप्ती महागाईपेक्षाही जास्त वाढत असेल तर महागाई जाणवणार नाही हे आलेच! असो.पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे?वर केलेले सैद्धांतिक विवेचन महत्त्वाचे आहेच, पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहणे अधिक महत्त्वाचे! आपल्या देशात गेल्या दहा वर्षांतील भाववाढ आणि पाच वर्षांतील भाववाढीची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार, सन २०१९ ते २०२४ या दरम्यान एकूण भाववाढ ३२ टक्के झाली. दरवर्षी ६.४ टक्के. तर २०१४ ते २०२४ या काळात ६४ टक्के भाववाढ झाली. दरवर्षी पुन्हा ६.४ टक्के! यानंतर कळीचा प्रश्न! मग आपली (सामान्य माणसाची) आर्थिक परिस्थिती सुधारली की खालावली? याचा विचार प्रत्येकाने आपापला वेगळा करणे आवश्यक आहे.
थोडक्यात १) गेल्या पाच वर्षांत आपली एकूण प्राप्ती ३२ टक्क्यांपेक्षा जास्त (आणि दहा वर्षांत ६४ टक्क्यांपेक्षा जास्त) वाढली असेल तर आपली परिस्थिती सुधारली असे मान्य करण्यास हरकत नाही. ‘महागाई हरली आणि आपण जिंकलो’ असे म्हणणे चूक नाही. मात्र ज्यांची प्राप्ती वाढली नाही, ज्यांना काहीही मोफत/नाममात्र किंमतीत मिळत नाही अशांची परिस्थिती खालावली हेही मान्य करावे. येथे महागाई जिंकली! मात्र हा दुबळा वर्ग हळूहळू का होईना पण कमी कमी होत आहे (गरिबी घटत आहे), ही समाधानाची बाब आहे.विकासाच्या प्रक्रियेबरोबरच देशात एकूण खर्च वाढल्यामुळे (मागणी वाढल्यामुळे) भाववाढ/महागाई वाढणे अटळ आहे.
परंतु त्याचबरोबर लोकांची प्राप्तीसुद्धा वाढते. त्यामुळे महागाई झाली तरी सुसह्य होते. तेव्हा विकासाचा वेग वाढवून लोकांची प्राप्ती वाढविण्यास सरकारने प्राधान्य द्यावे. असे सुचविल्यास चुकीचे होणार नाही.(लेखक मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.)

READ ON APP