Hero Image

क्षण पुरता जगून तर घ्या…

एका यूट्युब चॅनेलवर एक मुलाखत पाहत होते. विषय होता, इंटरनेटचे व्यसन. ती चर्चा संपूर्ण ऐकल्यानंतर त्यातला एक शब्द डोक्यात अडकून राहिला ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’. म्हणजे प्रसिद्ध असलेली किंवा नवीन आलेली एखादी गोष्ट बघायची राहून जाईल, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर व्यक्त व्हायचं राहून जाईल, ही भीती. अमुक नाटक, तमुक वेबमालिका, एखादं पुस्तक किंवा चित्रपट माहीत असायलाच हवा, असं वाटणं आणि हे माहीत नसेल तर आपण सगळ्यात ‘मिस आऊट’ होऊ, हे भय वाढताना दिसतं.
सोशल मीडियाच्या काळात तर हे अधिकच दिसतं. खरं तर एखादी गोष्ट नसेल माहीत, तर काय बिघडतं? हा सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी होण्याचा अट्टहास आपल्याला कुठे नेणार आहे, ही खरोखर चिंतेची बाब आहे. त्यातही माहीत नसूनही ते माहीत आहे, हे दाखवण्याचा अट्टहासच अधिक असतो. सर्व विषयांवर आपल्याला सगळंच माहीत असणं शक्य नाही, तरीही प्रत्येक विषयावर आपली मतं व्यक्त करायची असतात. सोशल मीडिया नावाच्या फुकटच्या स्पेसमध्ये ती मांडण्याची अहमहमिका लागते. बरं या माध्यमाला वयाचं बंधन नाही. एखाद्या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या तज्ज्ञ व्यक्तीबद्दल कालच अठरा वर्षे पूर्ण केलेला कुणी आग्रहाने मत व्यक्त करत असतो.
चित्रपट किंवा नाटक पाहणं असो, एखाद्या पर्यटनस्थळी केलेला प्रवास असो, की एखाद्या उपहारगृहात जाऊन केलेलं जेवण, या गोष्टींचा खरा आनंद घेतलाच जात नाही. त्याबद्दल कधी एकदा व्यक्त होऊ, असं होऊन जातं. अर्धवट मतं बनवली जातात. जेवणाचा आस्वाद घेण्याऐवजी पदार्थांचे फोटो काढण्यात वेळ जातो. त्या क्षणांचा खरा आस्वाद घेणं कमी आणि ते कॅमेऱ्यात कैद करणं, आपण हे सर्व केलं हे दाखवणंच अधिक होतं.थोडं मुळातून बघू या. म्हणजे बघा, माणसाची व्यक्त व्हायची गरज आजची नाही, तर आदिम आहे. म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी आदिमानवानं कोरलेली शिकारीची गुहाचित्रं दिसतात.
जगणं नश्वर आहे, हे ठाऊक असूनही माणूस हे का करतो? लेण्यांमधील शिल्पे, मंदिरावरील कोरीव काम, एखाद्या राजाच्या प्रशस्तीचा शिलालेख, भूर्जपत्रे, ताम्रपट… हे सगळं व्यक्त होण्याचाच भाग नाही का? या गोष्टी भूगोल आणि काळ ह्या दोन्हींच्या वाइड अँगल आणि लाँग शॉटच्या लेन्सने बघितल्या तर जगाच्या आणि काळाच्या दृष्टीनं कदाचित छोट्या आहेत. तरीही त्या घडतातच. प्रत्येक क्षणावर आपला ठसा उमटवण्याची इच्छा असतेच मनात.पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील आचार्यांच्या तोंडी वाक्य आहे, ‘मी घाबरलो होतो की, लोक विसरतील मला.’ यातून हे सगळं मानवी वर्तन स्पष्ट होईल.
आपण विस्मृतीत जाऊ किंवा ‘आउटडेटेड’ होऊ, याची भीती प्रत्येक व्यक्तीत असते. माणूस काळावर आपली खूण उमटवू इच्छितो. ती त्याची नैसर्गिक गरज आहे. तसं केलं नाही तर त्या काळाच्या तुकड्यामधून बाहेर फेकले जाण्याची, कालबाह्य होण्याची भीती त्याला असते. ‘आपल्यानंतर हे जग असंच चालणार,’ हे माणसाला खटकतं. त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात पाऊलखुणा मागे ठेवायच्या असतात. म्हणूनच सगळं नश्वर आहे, हे माहीत असूनही तो ते करत राहतो. पण या व्यक्त होण्यात एक ठहराव तर हवा ना. तो क्षण पुरता जगून तर घ्या, त्यानंतर त्याबद्दल इतरांना सांगा, कारण भूतकाळात जमा झालेला तो अमूल्य क्षण पुन्हा हातात येणं अशक्य.
- जागृती धनंजय बोडस, मुंबई

READ ON APP