Hero Image

कामगिराच्या नावाने बोंब आणि अंपायर्सवर भडकला हार्दिक, लाइव्ह सामन्यात पाहा झाले तरी काय

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स समोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला ८ पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवता आहे. आता उर्वरित लढतीत विजय मिळून मुंबईचा प्रयत्न प्लेऑफचे तिकीट मिळवण्याचा असेल. दिल्लीत सुरू असलेल्या या लढतीत मुंबईने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र हा निर्णय मुंबईसाठी आत्मघातकी ठरला असे दिसले. कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीच्या फलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासून मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईला महागात पडतोय की काय अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली. दिल्लीच्या फलंदाजांची धुलाई पाहून कर्णधार हार्दिक पंड्याचा संयम सुटला आणि तो थेट अंपायरवर ओरडल्याचे पहायला मिळाले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबई समोर २५८ धावांचा डोंगर उभा केला.
दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या सर्वच गोलंदाजांची बेदम धुलाई केली. यात हार्दिक पंड्याचा देखील समावेश होता. हार्दिकच्या २ ओव्हरमध्ये त्याने तब्बल ४१ धावा दिल्या. याचा राग मॅच सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हार्दिक चक्क अंपायर्सवर ओरडताना दिसतोय. दिल्लीचे खेळाडू मुद्दाम उशीर करून आरामात खेळत असल्याचे हार्दिकचे म्हणणे होते. यामुळे संघाला (मुंबईला) स्लो ओवर रेटचा दंड ठोठावला जाऊ शकतो आणि हा दंड कर्णधार हार्दिक पंड्याला भरावा लागू शकतो.
आणि हेच कारण होते ज्यामुळे हार्दिक अंपायरवर ओरडताना दिसला.आयपीएलच्या १७व्या हंगामात हार्दिकची कामगिरी चांगली झालेली नाही. रोहित शर्माकडून कर्णधारपद आल्यापासून त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला नाही. त्याच बरोबर मैदानात ना गोलंदाजीत ना फलंदाजीत त्याला प्रभावी कामगिरी करून दाखवता आली. अशात आजच्या लढतीत त्याची चिडचीड मैदानावरील अंपायर्सवर निघाली. आयपीएल २०२४ च्या हंगामात या आधी स्लो ओवर रेटमुळे लखनौ,चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली या संघाच्या कर्णधारांना १२ लाख रूपयांचा दंड बसला आहे.
या संघाच्या कर्णधारांनी ही चूक गिरवल्यास दंड दुप्पट केला जाईल. त्यामुळे या गोष्टीची दक्षता घेतना मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या दिसला. हा सामना जिंकण मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हार्दिकने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.

READ ON APP